Spodoptera mauritia
किडा
5 mins to read
सुरवंट रोपांना खातात आणि पानाच्या पात्यावर बंदुकीची गोळी मारल्यासारखी छिद्र पाडतात, पानांचे सांगाडे उरतात आणि खोड वाळतात. गंभीर प्रकरणांमध्ये, पूर्ण झुंडीच्या झुंडी लागवड केलेल्या भागात मोठ्या संख्येने शिरतात आणि एका रात्रीत गुरांनी फडशा पाडल्याप्रमाणे पीकाची नासधूस करतात. झुंडीनी येणारे सुरवंट पानाची टोक, शिरा आणि रोपही बुडाजवळ कातरून भातशेतीचे मोठे नुकसान करतात. रोपवाटिकेतील कोवळ्या रोपांना, थेट पेरणी केलेल्या कोवळ्या रोपांना आणि फुटवे निघण्याच्या काळात जास्त नुकसान होते. पीकाचा नाश केल्यानंतर अळ्यांच्या झुंडी दुसर्या शेताकडे लष्कराच्या शिस्तीत मोर्चा वळवितात. गेल्या दशकभरात, हे भाताच्या रोपांवरील गंभीर कीटक म्हणून उदयास आले आहे ज्यामुळे १० ते २०% नुकसान होऊ शकते.
छोट्या क्षेत्रात अळ्यांना खाण्यासाठी बदकांना सोडले जाते. प्रौढांचा नाश करण्याकरता बोलास कोळी जे मादी पतंगांसारख्या वासाचा कामगंध सोडतात, त्यांना सोडले जाऊ शकते. नर प्रौढ या वासाने आकर्षित होऊन परिणामी कमी संभोग होतो. स्टेनेरनेमा कार्पोकॅप्स सुत्रकृमी आणि न्युक्लिओ पॉलिहेड्रो व्हायरस असणाऱ्या औषधांची फवारणी या सुरवंटांविरुद्ध परिणामकारक आहेत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रादुर्भावाच्या सुरवातीलाच शेताच्या कडेने गॅमॅक्झिन (०.०२५%) ची धुरळणी केली असता सुरवंटाचे स्थलांतर टाळता येते. क्वलोपायरीफॉसवर आधारीत स्पर्शजन्य कीटकनाशके वापरली असता सुरवंटांचे नियंत्रण प्रभावीपणे होते.
स्पोडोप्टेरा मौरिशिया नावाचे सुरवंट हे नुकसान घडवितात. ही विभिन्न प्रकारच्या पिकांवर उपद्रव करणाऱ्या प्रजाती क्वचितच भातशेतीस गंभीर नुकसान करतात. पतंग राखाडीसर रंगाचे असुन त्यांच्या पंखांचा पल्ला सुमारे ४० मि.मी. लांब असतो. माद्या सवयीने निशाचर असुन बाहेर आल्यानंतर फक्त २४ तासात संभोग करतात. संभोगानंतर एका दिवसात त्या २०० ते ३०० अंडी पुंजक्याने विविध प्रकारच्या गवत, तण आणि भाताच्या पानावर घालायला सुरवात करतात. अळ्या पानाच्या पेशींना खातात आणि सहा प्रकारच्या टप्प्यातुन जाऊन मग ३.८ सें.मी. लांबीच्या होतात. पूर्ण वाढ झालेली अळी गुळगुळीत, दंडाकार असते आणि त्यांचे शरीर फिकट असुन त्यांच्या पाठीवर पट्टे असतात. दोन ओळीत C- आकाराचे काळे ठिपके त्यांच्या पाठीवर दिसतात. त्या रात्रीच्या वेळी खातात आणि दिवसाच्या वेळी जमिनीत लपतात. जमिनीत खणुन कोष तयार केला जातो.