Aleyrodidae
किडा
5 mins to read
शेतात आणि हरितगृहातील विविध पिकांवर पांढरी माशी सामान्यपणे आढळते. प्रौढ आणि पिल्ले झाडाचे रसशोषण करुन पान, फांद्या आणि फळांवर मधाळ रस सोडतात. त्यामुळे पानांच्या पात्यावर पिवळे ठिपके येऊन त्यावर बुरशी चढते. जास्त संक्रमण झाल्यास हे ठिपके एकमेकात मिसळतात आणि शिरांजवळील भाग सोडुन पूर्ण पानास व्यापतात. कालांतराने पान विकृत, गोळा झालेली किंवा वाटीच्या आकाराची होतात. पांढरी माशी टोमॅटोवरील घुबडा (बोकड्या) किंवा कॅसाव्हा ब्राऊन स्ट्रीक व्हायरस या रोगाला कारणीभूत असलेल्या विषाणूचे वहन करते.
पांढरी माशीची प्रजाती आणि लागवड केलेले पीक याप्रमाणे जैविक उपाय बदलतील. सीताफळ तेल (अॅनोना स्क्वॅमोसा), पायरेथ्रिन्स, कीटनाशक साबण, निंबोळीचा अर्क (एनएसकेइ ५%), नीम तेलावर (५ मि.ली./ली. पाणी) आधारीत नैसर्गिक किटकनाशकांची शिफारस केली जाते. तसेच एनकार्शिया फॉर्मोसा, एरेटमोसेरस एरेमिकस, सामान्य हिरवे लेसविंग्ज, क्रिसोपेर्ला कार्निया किंवा डेलफास्टस प्रजातीचे भुंगे या परजीवी वॅस्पसचा वापर सामान्यपणे केला जातो. शिकारी कोळी, सूत्रकृमि, हिरवे लेसविंग्ज, लेडीबर्डस, सूक्ष्म पायरेट बग्ज, बिग आइड बग्ज आणि डॅमसेल बग्ज इतर नैसर्गिक शत्रुत येतात. ब्युव्हेरिया बॅसियाना, इसारिया फ्युमोसोरोसे, व्हर्टिसिलियम लेकॅनि आणि पेसिलोमायसेस या जंतुजन्य बुरशी देखील वापरल्या जाऊ शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पांढरी माशी सर्व कीटकनाशकांविरुद्ध खूप लवकर प्रतिकार निर्माण करते, म्हणुन वेगवेगळे उत्पाद फेरपालट करुन वापरण्याची शिफारस करण्यात येते. बायफेन्थ्रिन, ब्युप्रोफेझिन, फेनोक्सिकार्ब, डेल्टामेथ्रिन, अॅजाडिराक्टिन, लँब्डा सायहॅलोथ्रिन, सायपरमेथ्रिन, पायरेथ्रॉईडस पायमेट्रोझाइन किंवा स्पिरोमेसिफेनवर अधारीत संयुक्त कीटकनाशकांचा वापर करुन किड्यांचे नियंत्रण करावे.
पांढरी माशी सुमारे ०.८-१ मि.मी. लांबीची असते व शरीर आणि दोन्ही पंखांच्या जोड्या पांढर्या ते पिवळसर भुकटीसारख्या मेणाच्या स्त्रावाने आच्छादित असते. त्या बहुधा पानांच्या खालच्या बाजुला आढळतात आणि जर झाड हलविले तर पांढरी माशी थव्यांनी उडते. ऊबदार, कोरड्या हवामानात त्या फोफावतात. पानांच्या खालच्या बाजुला अंडी घातली जातात. पिल्ले पिवळी ते पांढरी, चपटी, अंडाकृत आणि फिकट हिरव्या रंगाची असतात. यजमान रोपांना न खाता, प्रौढ काही दिवसांपेक्षा जास्त काळ जगु शकत नाहीत. यामुळे यांच्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी तण व्यवस्थापनाचे महत्व वाढते.